मी तिरंगा बोलतोय....
मी तिरंगा बोलतोय.....
झेंडा उँचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा...
असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता. हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तुमचा तिरंगा, राष्ट्रध्वज आहे मी! मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय. आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. सर्व भारतीय माझा आदर करतात.
बाल मिञांनो! या वर्षी आपण स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.देशात स्वातंत्र्याचा उत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. लहान- थोर सर्वांच्या मी मना-मनात आहेच परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 'हर घर तिरंगा' हे अभियान सुरु केल्यामुळे आता मी प्रत्येक भारतीयांच्या घरा घरात पोहचलो आहे. यामुळे मी अतिशय आनंदात आहे.
बाल मिञांनो!माझी डिझाइन पिंगली वैंकया यांनी तयार केली आणि 22 जुलै 1947 रोजी पार पडलेल्या संविधान सभेत मला मान्यता देण्यात आली. त्याग , शांतता आणि समृद्धी चे प्रतिक असणारे तीन रंग व त्यावर मधोमध शोभणारे अशोक चक्र यामुळे मी दिमाखदार दिसतो आणि तसाच डौलाने फडकतो.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावर प्रथम डौलाने फडकलो होतो.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन तारखांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी संपूर्ण देशात माझा उत्सव सुरु असतो. माझ्या प्रमाणे तुम्ही सुद्धा या दोन दिवसांची आतुरतेने वाट पाहत असता. नाही का?
बाल मिञांनो! आज जो मी आनंदाने अभिमानाने आकाशात डौलाने फडकत आहे त्यासाठी असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहूती दिली तसेच कुटुंबाची पर्वा न करता देशप्रेमाने झापाटून जाऊन निकराचा लढा दिला. माझ्यावरील अतीव प्रेमापोटी स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी तुरुंगवास भोगला, शारीरिक मानसिक छळ त्यांनी निधड्या छातीने सहन केला अशा सर्व स्वातंत्र्य वीरांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देणे हे सर्व भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे.
तिरंगा आकाशात मानाने फडफडावा म्हणून, तिरंग्याकडे म्हणजेच माझ्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये अथवा माझी हेटाळणी करू नये याकरिताच भारतीय तिन्ही सैन्य दलातील अधिकारी व जवान रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून भारताचे रक्षण करत आहेत.
बाल मिञांनो! तुम्ही देशाचे भविष्य अहात. आपल्या देशाची संस्कृती, परंपरा समृद्ध वारसा आणि आपला दैदिप्यमान इतिहास याचे जतन आणि संरक्षण करणे आणि मला डौलाने फडकत ठेवणे हे तुमच्या हतात आहे.
आज स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आहे या निमित्ताने आपल्या महान शूर वीर क्रांतीकारकांना वंदन करुन शेवटी म्हणावेसे वाटते
'उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा,
ज्यांनी हा भारत देश घडवला
वन्दे मातरम ,भारत माता कि जय
स्वातंत्र्य दिनाचा विजय असो.
जय हिंद जय महाराष्ट्र.
Nice sir
उत्तर द्याहटवा